मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या नावाने दंगली भडकवण्याची तयारी सध्या दिल्लीत सुरु आहे असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी विक्रोळी महोत्सवादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना केला. एमआयएम’चे ओवेसी यांच्यासोबत त्यासंबंधित बोलणी सुरु असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे करून दंगली भडकवण्याची जोरदार तयारी सुरु आहे. दिल्लीतुनच मला एकाने तशी फोनवरून माहिती दिली आहे असं राज ठाकरे म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारने मागील साडेचार वर्षात विकास कामं केली नसल्याने आणि इतर महत्वाचे मुद्दे झाकण्यासाठी हे सर प्रकार सुरु असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सामान्य जनतेला विकासासंबंधित दाखविण्यासाठी काहीच नसल्याने हिंदू-मुस्लिम समाजात राम मंदिराच्या नावाने तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याची जोरदार तयारी दिल्लीत सुरु आहे, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
“राम मंदिर नक्कीच व्हायला पाहिजे, परंतु ते २०१९ च्या निवडणुकीनंतर व्हायला पाहिजे”. केवळ हिंदू-मुस्लिम मतांच्या विभागणीसाठी हे सर्व प्रकार सुरु असल्याचे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी सतर्क रहाणे अत्यंत गरजेचे आहे. देशात सध्या बेरोजगारीची मोठी समस्या असताना भलत्याच धार्मिक विषयांवर सामान्यांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे राज ठाकरे म्हणाले.






























