8 October 2024 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

शूर मावळा....निष्णात बहुरूपी आणि गुप्तहेर 'बहिर्जी नाईक'

Story Bahirji Naik, Third Eye of Chhatrapati Shivaji Maharaj

श्रावणाच्या सरी कोसळत होत्या…शेतीची कामे करायला बळीराजा नव्या जोमाने तयारी करत होता…राजगडाला सह्याद्रीच्या राक्षसी पावसाचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक सुरु झाला होता…गेली चार वर्षे शाहिस्तेखानाने स्वराज्याला पिळवटून टाकले होते…त्यातुन स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते…पण आपला राजा सर्व काही ठीक करतील यावर जनतेचा विश्वास होता…सर्व काही निवांत होते…निसर्गाने कृपा केली होती पाऊस हात देत होता.

पण राजगडाच्या पद्मावती मंदिरात राजे अस्वस्थपणे येरझारा घालत होते….स्वराज्य शांत असले तरी राजांच्या मनाला शांतता नव्हती…स्वराज्य उभे राहत होते नाही ते धावते करायचे होते… स्वराज्याला मलमपट्टी करायची होती..अनेक उध्वस्त संसार नव्याने मांडायचे होते….पण कसे करणार सर्व … राजांच्या भव्य कपाळावरचे दुभोटी गंध चिंतेमुळे आक्रसले जात होते… राजांची नजर राजगडापासून दीडशे कोस दूर असलेल्या औरंगजेबाच्या “सुरतेवर” रोखली होती…पण लगेच आज ठरले आणि उद्या निघाले असे करून चालणार नव्हते …कामगिरी फत्ते करण्याआधी तिथली खडानखडा माहिती हवी होती…अनेक ठिकाणी मोगलांची ठाणी होती..खडी सेना होती…आणि स्वराज्यालातले काही घरभेदी हि होते आणि मुख्य म्हणजे ती सुरत हि काही ऐऱ्या-गैऱ्या ची नव्हती.. साक्षात औरंगजेबाची होती…

तेवढ्यात मंदिराचे पुजारी राजांसमोर आरतीचे ताट घेऊन आले ….राजांची नजर त्या पुजाऱ्याच्या चेहऱ्यावर लागली होती…तो नेहमीचा पुजारी वाटत असला तरी तो नव्हता… त्या माणसाने अगदी त्या पुजाऱ्याच्या वेष अगदी हुबेहूब वठवला होता….दोघांची नजरानजर होता…राजांच्या कपाळावरचे दुभोटी गंध शिवाच्या तिसऱ्या डोळ्यासारखे अगदी स्थिर झाले…चिंता जाऊन चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली…आणि राजे बोलते झाले…व्वा बहिर्जी व्वा… आणि राजांनी बहिर्जीना आपला मनसुबा सांगितला….मंदिरा बाहेरच्या सैनिकांना वाटत होते राजे नेहमीच्या पुजाऱ्याशी बोलत आहेत..किंबहुना त्यांच्या लेखी “बहिर्जी नाईक” नावाची कोणीही व्यक्ती अस्तित्वातच नव्हती….थोड्या वेळाने राजे निवांत होऊन दर्शन करून मंदिरातून निघाले आणि “बहिर्जी नाईक” पाली दरवाजातून पाली गावात उतरून आले… ते फकिराच्या वेषात…एका घरासमोर उभे राहुन भिक्षा मागितली…आणि एका तिथल्या मशिदीत माथा टेकुन गावजवळच्या जंगलात रवाना झाले…आणि काही वेळाने तो भिक्षा देणारा आणि मशिदीच्या समोर असणारा भिकारी येऊन बहिर्जीना भेटले…

बहिर्जीनी आपल्या साथीदारांना राजांचा मनसुबा सांगितला आणि त्यांनी त्या जंगलात सांकेतिक भाषेत आवाज दिले … ते ऐकून त्यांना त्याच सांकेतिक भाषेत उत्तर आले आणि काही वेळातच अजुन काही साथीदार येऊन त्यांना भेटले…थोडा वेळ त्या सर्वात काही बोलणं झाले आणि सर्व वेग वेगळ्या वाटांनी औरंगजेबाच्या सुरतेला रवाना झाले ….. कामगिरी तशी सोप्पी नव्हती …स्वःत राजे जातीने कामगिरी पार पाडणार होते…कुठेही कसूर झालेली चालणार नव्हती.. एकवेळ सुरतेचा खजिना नाही आलं तरी चालेल…पण लाखांचा पोशिंदा… स्वराज्यच धनी… सुखरूप परत आणायचे होते …. त्याच विचारात बहिर्जीचा घोडा सुरतेच्या दिशेने उधळला…राजगड आणि राजे आता अगदी निवांत झाले होते…पावसाने जोर धरला होता ….बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनीसुद्धा….

खूप मोठी मोहीम होती…आपल्या साथीदारांना आवश्यक ते सूचना देऊन आणि त्यानां सुरतेच्या दिशेच्या रवाना केले … आणि स्वतः मात्र राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या निबिड जंगलात धाव घेतली…बहिर्जी जसे जंगलात आत जात होते तसे जंगल अजून दाट होते होते … सकाळीही सूर्याची किरणे जमिनीवर यायला बिचकत असत त्यात हा राक्षसी पाऊस … संध्याकाळ का सकाळ काहीही काळत नव्हते..बहिर्जीनी एका ठिकाणी घोडा थांबवला आता पुढे पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

एक दोन टेकाड ओलांडून बहिर्जी जंगलात एका ठिकाणी मोकळ्या जागेवर येऊन उभे राहिले …. आसपासचा अंदाज घेतला आणि समोर असणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडाला वळसा घालून त्या झाडाच्या पाठच्या बाजूला येऊन उभे राहिले… आणि समोर असणाऱ्या निवडुंगाच्या झाडीकडे वाटेतले दगड धोंडे आणि एक छोटी नदी पार करून चालते झाले … ती निवडुंगा ची झाडी चांगली २ ते ३ पुरुष उंचीची होती…पुढे जायला अजिबात रस्ता नव्हता … मग बहिर्जी का आले होते तिथे.???.. सुरतेचा रस्ता तर दुसरा होता ! मग काय कारण होते?? ……… बहिर्जीचे जमिनीवरचे साथीदार तर तयार झाले होते….पण आकाशातले साथीदार ते सुद्धा येणार होते ना…अहो राजा येत होता स्वतः मग ते असे पाठी राहतील…स्वराज सर्वांचे होते.. एका खारुताईने नाही का प्रभू रामचंद्राला सेतू बांधायला मदत केली होती.

निवडुंगाच्या झाडी जवळ आल्यावर बहिर्जीनी एक सांकेतिक आवाज काढला… आणि तसाच आवाज दोन तीनदा झाडीच्या पलीकडून आला… आणि अलिबाबाच्या गुहेचे दार उघडावे तसे त्या निवडुंगाची भिंतीत एक दरवाजा उघडला गेला… आणि बहिर्जीनी मोकळ्या मैदानात पाय ठेवला नसेल तेवढ्यात ६ ते ७ बहिरी ससाणे ,काही गरुड, कबुतरे यांनी कल्ला करायला सुरवात केली…आपल्या पोशिंद्याला त्यांनी बरोबर ओळखले होते…आणि तेवढ्यात लगबगीने जिवाजी आणि भिवाजी धावत आले… हे जिवाजी आणि भिवाजी बंधू पक्षी आणि प्रांण्यांचे आवाज काढण्यात एकदम पारंगत होते आणि प्रांण्यांची भाषा सुद्धा जाणत होते…बहिर्जीनीच त्यानां शोधले होते… बहिर्जीनी त्या बंधूंना काही सुचना दिल्या तसे त्यांनी ३ ते ४ बहिरी ससाणे २ गरुड आणि काही कबुतरे यांना मोकळे केले…आणि त्या स्वराज्याचा मूक शिलेदारांनी…त्या राक्षसी पाऊसाला न जुमानता आकाशात झेप घेतली.

जिवाजी आणि भिवाजी आपल्या माणसांना काही खास सूचना दिल्या…आणि ते बंधू आणि बहिर्जी त्या निवडुंगाच्या झाडीतून बाहेर आले… आणि बहिर्जीनी मगाशी घोडा थांबवलेल्या ठिकाणी आले. तिथुन उत्तर दिशेला ४ ते ५ मैल ती तिघे चालत गेले आणि एक डोंगरावर चढले आणि जंगलातली ती सर्वात उंच जागा असल्यामुळे तिथुन आसपासचे जंगल नीट नजरेत येत होते.

तिथेच बहिर्जीनी आणि जिवाजी आणि भिवाजी बंधूनी थोडा आराम केला आणि पाठीशी बांधलेला भाकर तुकडा तोडला.. काही वेळ आसपास चा अंदाज घेतला… आणि अंदाजे एक ते दोन तासापूर्वी सोडलेले दोन बहिरी ससाणे आणि एक गरुड.. ते तिघे आराम करत असलेल्या जागी आले… तेव्हा त्यांच्या पायाला चिट्ठ्या बांधल्या होत्या…त्यांत सांकेतिक स्वरूपात काही माहिती होती….कोंढाणा आणि राजा जसवंतसिंगाबद्दल राजगडा पासून ३० ती ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या ” कोंढाणा ” किल्ल्याला राजा जसवंतसिंग वेढा घलून बसला होता….. पण फक्त बसलाच होता.. सह्याद्रीचा पाऊस आणि जंगल ह्याच्यापुढे त्याचे काहीच चालत नव्हते….. बहिर्जीना आधी मिळालेली माहिती खरी होती आणि आता तर त्यावर शिक्कामोर्तब झाले होते…राजा जसवंतसिंग आणि त्याचे १० हजाराचे सैन्य काहीच करत नव्हते… अहो अश्या पावसाची कुठे सवय होती त्याना आणि मराठे पण त्याला काहीच त्रास देत नव्हते बसतोय तर बसुंदे आता पुढे कूच करायला काहीच हरकत नव्हती…

त्या चिट्ठ्या वाचून बहिर्जी बोलले… ” जिवाजी आणि भिवाजी फार मोठी जोखीम आहे…आता उन्ह उतरतील आपले घोडे तयार ठेवा…रातच्या पहिल्या पहारी निघू… जिवाजी बोलले पण बहिर्जी रातच्याला का ??? आणि सकाळी दिवसा उजेडी का नग…बहिर्जी हसले आणि बोलले… अर आपलं धनी पण आपल्यसंगट येणार हायेत ??? कुणाची नजर नको पडायाला ??? कुठं जातोय काय करायला जातोय ?? काहीच नग समजायला !!!!

काही वेळाने बहिर्जी ,जिवाजी आणि भिवाजी डोंगर उतरून खाली आले आणि सरळ सोपा मार्ग सोडून जंगलातल्या वाटेनेच…दौडत सुरतेच्या दिशेनेच निघाले … आता काही दिवस रात्रीचा उजेड करायचा होता… औरंगजेबाच्या सुरतेवर आता हात मारल्याशिवाय बहिर्जीना आता चैन पडणार नव्हती….

बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी दौड करतच होते….सोबतीला कोण होते..किर्र काळोख….रानवेडा पाऊस… भर्राट वारा…घनघोर जंगल… वेडया वाकड्या वाटा… डोंगर दऱ्या आणी स्वराज्य सांभाळणारा सह्याद्री…. आई भवानी आणि राजांचा हात होता डोक्यावर मग घाबरायचंय कशाला.. पाऊस थांबला होता…झुजूमुंजू होत होते..बळी राजा आपल्या सोनपिवळ्या शेताच्या दिशेने चालला होता…कोंबडे जिवाच्या आकांतने ओरडत होते…स्वराज्य हळूहळू जग होत होते . आता तिघांनी घोडे अजूनच जंगलात पिटाळले.. त्या तिघांची नजर काहीतरी शोधतं होती… एखादी चोरवाट, भुयार… जंगलाच्या पोटात लपलेली एखादी मोकळी जागा… येणारा खजिना सांभाळून आणायला काहीतरी जागा नको … एवढे पाच-सहा हजार मावळे..तेवढेच किंबहुना जास्त घोडे.. मग ते थांबणार कोठे…ठिकठिकाणी मोगली सरदार… ठाणी… खडे सैन्य होते..

एका छोट्या टेकडीवर चढून…भिवाजीने आपल्या दोस्तांना आवाज दिला आणि हुकमेसरशी बहिरी ससाणा आकाशात घिरट्या घालू लागला .. पुढे गेलेल्या साथीदारांनी निरोप पाठवला होता.. रस्ता सांगितला होता …जागा पहिल्या होत्या….पुढे सात -आठ दिवस बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी यांचा तो परिपाठच होऊन गेला होता… रात्री दौड आणि सकाळी थोडा आराम करून जंगलाचा कानोसा.

आता “सुरत” नजरेच्या टप्प्यात होती… बहिर्जी मोगली सैनिकाचा वेष परिधान करून एकटेच पुढे झाले…भिवाजी आणि जिवाजी तिघ्यांच्या घोड्यांची आणि पाठून येणाऱ्या पाच ते सहा हजार मावळ्यांची आणि त्यांच्या घोड्यांची व्यवस्था लावण्यासाठी पाठी थांबले.

“सुरत”…. दक्षिणेला भरभक्क्म बुरहाणपूर दरवाजा… मुख्य रस्ता तिथूनच होता… बाजूला खळाळता समुंद्र…समुद्रावर सज्ज असलेली कित्येक मोगली जहाज… डच ,इंग्रज , पोर्तुगीच,अरब त्यांच्या वखारी… व्यापारी बहरजी बोहरा, हाजी कासम, हाजी बेग ,अब्दुल जाफर यांचे उंची महाल…मोठमोठे वाडे… त्याला सोन्याचे खांब …नक्षीदार कमानीच्या खिडक्या… प्रशस्त रस्ते त्या वरून धावणाऱ्या मेणा,पालख्या , इंग्रज्यांच्या चार चाकी बग्ग्या…व्यापारी आणि यात्रेकरू यांच्यासाठी बांधलेल्या सराया… देशोदेशीचे वकील..खास औरंगजेबासाठी नजराणा म्हूणन आणलेले जातिवंत २०० अरबी घोडे…कित्येक प्रकारची दुकाने होती सुरतेच्या सुभेदार ” इनायत खानाच्या” किल्ल्याबाहेरच…. कुठं केशर,कस्तुरी,चंदन,अत्तर,हस्तिदंत,रेशीम आणि जरीचे कापड,उंची वस्त्रे होती’… गुलामांचा आणि स्त्रियांचा व्यापार त्यातून मिळणारे रग्गड उत्त्पन…..पण राजांना यातील काही नको होते…फक्त सॊने, चांदी, माणिक, मोती , बस्स एवढेच हवे होते….सागरातून फक्त तीन ते चार मुठी हव्या होत्या.

श्रीमंत योगी होता आपला राजा. सोन्याचा धूर येत होता…औरंगजेबाची सोन्याची राजधानी होती ती…कुबेराची श्रीमंती सुद्धा त्याच्यापुढे काडीमोल होती…

सुरतेच्या आसपास तिन्ही बाजूला समुद्र…पूर्ण भारतवर्षात पसरलेले मोगली साम्राज्य…एकसो एक शूर सरदार…लाखो सैन्य…घोडं-दळ,पायदळ,शेकडो जहाज … अगणित संपत्ती… आणि त्यांचा शहेनशहा …”औरंगजेब”… मग कोण नजर वर करून बघणार अशा सुरतेकडे…कोण बघणार ??? सह्याद्रीच्या शिवाचा तिसरा डोळा आता उघडला होता आणि औरंगजेबाच्या सुरतेवर फिरत होता…काही दिवसातच सुरत पेटणार होती … बहिर्जी नाईक सुरतेच्या पोटात शिरले होते….नव्हे शिवाचा तिसरा डोळाच सुरतेतून फिरत होता….

कधी भिकारी, कधी व्यापारी, कधी फकीर,कधी सैनिक,कधी मजूर, कधी सैनिक अश्या हजार वेषात बहिर्जी आणि त्यांचे साथीदार सुरतेत जवळजवळ महिनाभर फिरत होते….कुठे जास्त घबाड सापडेल,कुठे अजिबात जायचे नाही…कुठच्या व्यापाऱ्याच्या महालात तळघर आहे…कोणच्या घरात तिजोरी भरभरून वाहत आहे…कुठे लपण्याच्या किंवा लपवण्याच्या जागा आहेत…कुठे चोरवाट आहे…कुठे छोट्या छोट्या गल्ल्या, कुठे मोठेमोठे रस्ते…कुठे दुकाने आणि गोदामे आहेत…कुठच्या दुकानात काय दडले आहे…हे सर्व बहिर्जी पाहत होते…आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली…ऐकीव माहिती प्रमाणे जवळ जवळ ४ ते ५ हजार सैनिक…सुरतेच्या रक्षणाकरिता तैनात केले होते, पण महिनाभर सुरतेत फिरूनसुद्धा त्यांचा ठाव ठिकाणा किंवा त्यांचे काहीच अस्तित्व दिसत नव्हते….मग गेले कुठे ???

त्याचे उत्तरही लगेच मिळाले ….बहिर्जीच्या साथीदारांनी खुद्द सुभेदाराच्या महालात जाऊन माहिती काढली होती…. ४ ते ५ हजार सैनिक फक्त नावालाच होते…प्रत्यक्षात सैनिक होते १ ते २ हजार…५ हजार सैनिक दाखवून सुभेदार इनायत खान…त्यांचा पैसा लाटत होता… बहिर्जी मनातल्या मनात खूष झाले…तिथे लढाई करायला सुद्धा सैन्य नव्हते.. सगळी तयारी झाली होती… आता एक शेवटचा डाव टाकायचा बाकी होता….

एके दिवशी बहिर्जीनी त्यांचा साथीदारांना वेशीबाहेर जंगलात भेटायला सांगितले….आणि एक डाव रंगला…पूर्ण सुरत शहर झोपले होते…आणि अचानक घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू यायला लागला…आणि त्यापाठोपाठ ” हर-हर महादेव” च्या घोषणा…कोणाला काय होते ते कळेचना असा कसा शिवाजी आला… इतक्या लांब…भूत विद्या अवगत आहे का त्याला…बहिर्जी चे साथीदारांनी काम चोख बजावले होते…सुरतेत गडबड चालू झाली…काळोख्या रात्री दिवस झाला…जो तो व्यापारी बैलगाड्या भरून आपला खजिना सुरतेच्या बाहेर काढला…आणि भरूच शहराच्या दिशेने पळायला लागले..बहिर्जी गुपचूप त्यांच्यावर लक्ष ठेवून होते…अर्धाहुन सुरतेचा खजिना आता भरूच शहरात आला होता…कोणी पहारेकरी नाही…किल्ला नाही.. सैन्य नाही…बस्स न लढता असा खजिना मिळाला तर काय भांडायची गरज होती…बहिर्जीनी तिथे आपले हेर पेरून ठेवले…. हि अशी गम्मत बहिर्जी नी पुढच्या महिन्याभरात अजून दोन तीनदा करून पहिली…कुठे खजिना जातो?? कुठच्या रस्त्यानं जातो?? सगळे पाहून ठेवले…

आता ” शिवाजी आला .. शिवाजी आला ” ऐकून सुरत मधील व्यापारी पण निवांत झाले होते…तत्यानां समजून चुकले होते कोणीतरी आपली गंमत करतेय…. पण खरी गम्मत तर बहिर्जी आणि राजे करणार होते… सुरत खरोखरीच लुटली जाणार होती… ” हर-हर महादेव” च्या घोषणा. खरोखरीच होणार होत्या…सगळी बित्तम बातमी काढून बहिर्जी आणि त्यांचे काही साथीदार राजगडाकडे दौडत सुटले होते… भिवजी आणि जिवाजी राज्यांच्या स्वागतासाठी पाठीच थांबले होते… थोड्याच दिवसात “सुरत” बेसुरत होणार होती…दख्खन चे वादळ धडकणार होते…

एक मराठा सरदार …राजांना भेटायला आला होता…स्वराज्याच्या सेवेसाठी स्वतःला हाजीर करण्याचा मनसुबा होता…काही छोटे मोठे नजराणे आणले होते…योग्य ती चाचपणी केल्यानंतर त्याला महाराजांसमोर उभे करण्यात आले…त्याने स्वतःचा मनसुबा पूर्ण राजसभेसमोर सांगितला…आणि निघता निघता राजांना आपल्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले….त्यातील मजकूर काहीसा असा होता… ” नवरी मुलगी दागदागिने परिधान करून आणि नटून थटून तयार आहे… राजे तुमच्या आशीर्वादाची शुभ कार्य सुरळीत पाडण्यासाठी गरज आहे…सर्व काही आलंबेल आहे…वऱ्हाडी आणि वाजंत्री यांची योग्य ती सोय केलेली आहे तेव्हा तुम्ही आणि तुमचे समस्त कुटुंब लग्नाला चला…लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला”… तो मजकुर वाचून राजांच्या चेहऱयावर स्मित रेषा उमटली आणि राजांना कळून चुकले तो मराठा सरदार दुसरा तिसरा कोणी नसून आपला बहिर्जीच आहे…

आमंत्रणं तर आले होते आता लगबग करायला हवी होती…मुहूर्त चुकता काम नये…राजांनी आपल्या साथीदारांना आदेश दिला ५ दिवसांत…नव्या कामगिरीवर निघायचे आहे…लगबग सुरु झाली…अवघ्या ५ दिवसांत…उत्तोम उत्तम ६ हजार घोडेस्वार आणि अजून जास्त १ ते २ हजार घोडे तयार झाले… पण दिवसाउजेडी निघणे धोकादायक होते…जवळचं जसवंतसिंग कोंढाण्याला १० हजार सैन्यासह वेढा घालून बसला होता… तो जर सामोरा आला असता तर सर्व काही फसले असते…तेव्हा रोज दोन हजार सैनिक असे तीन दिवस …बहिर्जीनी शोधलेल्या जंगलातल्या वाटेवरून…जसवंतसिंग आणि त्याच्या सैन्याच्या नजरेपासुन आणि वेढ्यापासून दूर एका गुप्त ठिकाणी थांबले होते….

राजे स्वतः आणि काही निवडक साथीदार आणि बहिर्जी नाईक वेष बदलून २ हजार घोडयांसकट मुख्य रस्त्याने निघाले… कोणी विचारले असता ते सांगत…खुद्द औरंगजेबाला हा घोडयांनाचा नजराणा पेश करण्यासाठी चाललो आहोत…मग कोण हो अडवणार त्यांना…कोणाला बादशाही मर्जी खप्पा करून घ्यायची हिम्मत होती….दोन दिवसांनी राजे आणि ६ हजार घोडेस्वार एका ठिकाणी जमा झाले…आणि तिथुन ठरल्याप्रमाणे त्र्यम्बकेश्वर मंदिराच्या दिशेनं कूच केली…राजांनी आणि मावळ्यांनी दर्शन घेतले…आणि निघता निघता बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी एकच अफवा सोडून दिली.

औरंगाबादवर चढाई करायला चालो आहोंत…तेव्हा नुकताच शहाजादा मुज्जम तिथे रुजू झाला होता… त्याला हि बातमी समजली आता आपल्याला शौर्य दाखवायची मोठी संधी चालून आली आहे…आणि सिहासनावर हक्क दाखवायला संधी चालून येत होती…आणि मुज्जम च्या आदेशानुसार सर्व सरदार आणि सैन्य औरंगाबादच्या वेशीवर जमा झाले…राजांचे स्वागत करायला…पण राजे तिथे कुठे येणार होते…ते तर निघाले सुरतेला …सर्व मोकळा रस्ता मिळाला.. जे काही मोगली ठाणी होती तिथे नाममात्र सैन्य होते…त्यांना तेच कारण सांगत होते औरंगजेबाला मुजरा पेश करायला चालो आहोत… इथे शहाजादा मुज्जम ला काही कळेचना हे मराठे येत का नाही…जागा सोडू शकत नाही…मराठे म्हणजे भुते कुठूनही उगवतील…

मजल दरमजल करत राजे, बहिर्जी आणि ती ६ हजार सह्याद्रीची भुते सुरतेपासून आत फक्त २ ते ३ मैलाच्या अंतरावर पोहचली होती…अजूनही कोणाला थांगपत्ता लागला नव्हता…सुरतेत सकाळ होत होती…आणी अचानक कल्ला वाढला..सोने ,नाणे लपवायला हि वेळ नव्हता… मराठयांची छावणी अचानक एका रात्रीत उगवली होती…काहींचं समजत नव्हते…हि भूत एवढ्या लांब आलीत कशी…मोठमोठे व्यापारी घाबरून इनायत खानाच्या आश्रयाला आले होते… तेवढ्यात राजांचे खंडणीचे चे पत्र इनायत खानाला पोहचते झाले…त्यात बहरजी बोहरा, हाजी कासम , हाजी बेग आणि अब्दुल जाफर आपली नवे ऐकून रडायलाच लागले …त्यांना आपली नावे समजलीच कशी…त्यांना खंडणी ठरवण्यासाठी पाचारण केले होते …नाहीतर दुपारनानंतर…सुरत बदसुरत होणार होती….पण कोणी आलेच नाही…उलट राजांनी पाठवलेल्या स्वारालाही धमकी देऊन पाठवले गेले.

मग काय आदेश होताच हरहर महादेवच्या गजरात सुरवात झाली…बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी कुठे कुठे खुणा करून ठेवल्या होत्या…ती घरे, दुकाने, गोदामे सर्वप्रथम लुटली गेली..मंदिरे,चर्च, मशिदी आणि स्त्रिया आणि मुले यांच्याकडे चुकूनही कोणी डोळां वर करून पहिले नाही आणि काही सद्गृहस्थ आणि दानशूर व्यापारी…यांना कोणीही हात लावला नाही…महाल..घरे.. गोदामे.. वखारी तीन दिवस जळत होत्या…होत्या चे नव्हते झाले होते…कित्येक कैदी झाले होते…

त्यातच इनायत खानाने राजांवर मारेकरी पाठवण्याच्या मूर्खपणा केला होता…त्यामुळे अजून चवताळून मराठे जे दिसेल त्याला आग लावत होते…सहयाद्रीच्या शिवाचा तिसरा डोळा आता उघडला होता… सुरतेत आता फक्त अग्नी तांडव करत होता… खूप सारी खंडणी राजांनी आता गोळा केली होती…तेवढ्यात बहिर्जींच्या साथीदारांनी खबर आणली…कोणी एक मोगली सरदार सुरतेच्या दिशेने येत आहे…लढाई करायला वेळ नव्हता.. मग काय जेवढे गोळा झाले होते तेवढे घेऊन राजे आणि बहिर्जीं आणि ती भुते राजगडाच्या वाटेला लागले…दिवसा आराम आणि रात्री प्रवास करून राजे आणि खजिना …राजगडाच्या पायथ्याशी आला होता…

बहिर्जी नाईक, जिवाजी ,भिवाजी आणि त्यांचे हेरखातं…राजे ,राजगड आणि सह्याद्री आता निवांत झाले होते…राजा सुखरूप आला होता…..बहिर्जीनी मोठी कामगिरी बजावली होती….

खरंच सर्व काही निवांत होते ???….नव्हे सुरतेची बातमी कशी लपून राहील बादशाह पासुन…मिर्झा राजे जयसिंग नावाचे वादळ आता सहयाद्रीच्या दिशेनं तुफान वेगात सुटले होते…खुद्द राजांना औरगंजेबासमोर पेश करण्यासाठी …तेव्हा तर बहिर्जीना जीवनातली सर्वात मोठी कामगिरी पार पाडायची होती…

 

Story English Title: Story Bahirji Naik Third Eye of Chhatrapati Shivaji Maharaj history on Maharashtranama.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x