भोपाळ : दलित समाजाच्या केवळ दोन पिढ्यांनाच नोकरी तसेच शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. परंतु त्यानंतर त्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत दलित आरक्षणाला विरोध करत देशभरातील सवर्ण समाजाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य प्रदेश, राजस्थान तसेच बिहार राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत.
भाजपप्रणीत राज्यांमध्ये विशेष खबरदारी म्ह्णून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संवेदनशील भागातील शाळाही बंद राहणार असून, काही अघटित घडू नये म्हणून मध्य प्रदेशातील काही पेट्रोल पंपसुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मध्य प्रदेश पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष अजय सिंह ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीत म्हणाले.
आंदोलनकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेऊ नये असं आवाहन सुद्धा केलं आहे. दरम्यान, जात तसेच धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचा विरोध करत यूपी’मधील नोएडा येथे मोर्चे सुद्धा निघाल्याचे पाहावयास मिळाले. या भारत बंदमध्ये नोएडा लोक मंच म्हणजे एनइए, द ब्राह्मण समाज सेवा समिती, द अग्रवाल मित्र मंडळ सहभागी झाल्याचं वृत्त ‘न्यूज नेशन’ने जारी केलं आहे.






























