‘बिग बॉस’ ने घरातील स्पर्धकांना आपापल्या बागेत अधिकाधिक फुलं लावण्याचा टास्क दिला होता. परंतु हा टास्क पूर्ण करताना स्पर्धकांनी युक्ती आणि मेहनतीने आपला टास्क पूर्ण करणे अपेक्षित होते, याउलट स्पर्धकांनी फक्त ताकदीचा वापर केला. एकमेकांना धक्काबुक्की करण्यापासून ते एकमेकांना उचलून बाजू करण्यापर्यंत स्पर्धकांची मजल गेली. आणि हिंसेचा वापर अजिबात करू नका असे आव्हान बिग बॉस ने करून सुद्धा स्पर्धकांनी त्याला फाटा दिला.
शक्तिप्रदर्शनामध्ये सुशांत आणि राजेश सर्वात पुढे होते. ‘आपण कुठे आहात व काय करत आहात? याचे अजूनही आपल्याला भान नाही’ अशा कठोर शब्दात खुद्द बिग बॉसनेच राजेश व सुशांतचा समाचार घेतला. पुन्हा त्यांच्याकडून असे काही घडले आणि इतर सदस्यांना इजा झाली तर त्याचवेळी त्यांना घरातून बाहेर काढण्यात येईल असा सज्जड दम बिग बॉस ने दिला.
सुशांत आणि राजेशने केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून बिग बॉस ने त्यांना घरातील भांडी घासण्यापासून ते इतर सदस्यांची कपडे धुण्यापर्यंतची सर्व कामं करण्यास सांगितले. सर्वांचा स्वयंपाकही या दोघांनाच करावा लागणार आहे. या कामात घरातील इतर सदस्य त्यांना मदत करणार नाहीत, अशी सूचनाही बिग बॉसने केली. त्यामुळं राजेश आणि सुशांत ही कामे कशी करतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.






























