मुंबई : मुंबई शहरातील पहिल्याच पावसाने जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते सुद्धा दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा सुद्धा खोळंबा उडाला आहे. त्यातच जवाबदारी घेण्याऐवजी मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दोषारोप करण्यात गुंतले आहेत.
मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनाही शिवसेनेवर हल्लबोल केला आहे. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ असं म्हणण्याची वेळ आली आहे, कारण जवाबदारी घेण्याऐवजी जवाबदारी झटकण्याचे प्रकार महापौर विश्वनाथ महाडेश्वरांन कडून होत आहे असं आशिष शेलार म्हणाले.
मुंबई शहरात काल पासून होणाऱ्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक जण आज शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. परंतु आशिष शेलार यांनी उद्भवलेल्या परिस्थितीला शिवसेनेला लक्ष करत असं विधान केलं की,’मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी पावसानंतर ‘पळून दाखवलं’ असच म्हणावं लागेल.
विशेष म्हणजे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मुंबईतील परिस्थिती उघड्या डोळ्याने दिसत नसावी अशी प्रतिक्रिया दिली आहे. पावसामुळे संपूर्ण मुंबईभर पाणी तुंबले असताना महापौरांना मुंबईमध्ये पालिकेच्या कामामुळे कुठेच पाणी तुंबल्याचं दिसत नाही असं वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. महापौर असं सुद्धा म्हणाले की, ‘मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलं मात्र तुंबलेलं नाही’.
त्यामुळे आता सत्ताधारी जवाबदारी स्वीकारण्याऐवजी एकमेकांवर केवळ आरोप करण्यात वेळ काढतील अशी परिस्थिती आहे.






























