मुंबई : जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात सगळं ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ५वा दिवस असून त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले. दरम्यान, अण्णा उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा देत काही चांगल्या आणि वाईट गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत.
दरम्यान, आजच्या सामनातून अण्णा हजारे यांच्या उपोषणाची केंद्र आणि राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी. अण्णा हजारेंचे प्राण महत्त्वाचे असून सरकारने त्यांच्या आता वाट पाहात त्यांच्या जीवाशी खेळू नये, असे थेट आवाहन केले आहे. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आजचा सलग ५वा दिवस असून त्यांची प्रकृती वजन घटत चालल्याने नाजूक होत चालली आहे. तसेच पंतप्रधानांनी अण्णांच्या ‘आमरण उपोषणास’ शुभेच्छा देणारे पत्र पाठवावे हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि तितकाच हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सामनातून म्हटले आहे.
“दरम्यान अण्णा हजारेंच्या लढा हा भ्रष्टाचारविरोधी आहे आणि ती संपूर्ण देशाचीच समस्या आहे. परंतु, आमरण उपोषण करुन प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरुन लढा द्यावा आणि समस्त देशाला जाग आणावी. सध्या देशातील सामान्य जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. तसेच अण्णा हजारेंनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांच्यासारखी भूमिका आता स्वीकारावी. गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वारला प्रा. अग्रवाल उपोषणास बसले आणि त्यांच्या उपोषणाची दखल न घेता त्यांना मरु दिले. तसेच देशाची गंगा शुद्ध करण्यासाठी अण्णांनी उपोषण सोडावे आणि प्रखर लढा उभारावा. जेथे शक्य आहे तेथे शिवसेना पक्ष अण्णांना सोबत केल्याशिवाय राहणार नाही!”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.






























