20 April 2025 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

नवी मुंबई: अविनाश जाधव यांच्यावर आरोप करत गजानन काळेंचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

MNS Leader Gajanan Kale, Avinash Jadhav, Abhijeet Panase, Raj Thackeray, Avinash Jadhav

नवी मुंबई: एका बाजूला राज्याच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे कार्यकर्त्यांसोबत थाळीनाद नवी मुंबईतील मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागाने त्यांनी पूर्णवेळ कार्यरत होण्याचा निर्णय घेतला असावा असं म्हटलं गेलं. नवी मुंबईतील ६५०० कामगारांचे १४ महिन्यांचे वेतन महापालिकेकडे थकीत आहेत ते पैसे कामगारांना मिळवून देण्यासाठी अमित ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत निद्रिस्त प्रशासनाला जागं करण्यासाठी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली नवी मुंबईत महापालिका कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थाळीनाद आंदोलन केलं. पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी (एकूण ९० कोटी रुपये) तसंच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

एकाबाजूला अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागातून होकारात्मक चित्र असताना, नवी मुंबई आणि बेलापूर’मधील पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकं काय बिनसलं ते अजून स्पष्ट झालं नव्हतं. कारण अमित ठाकरे यांचा मोर्चातील सहभाग आधीच निश्चित झालेला असताना, त्याआधी दोन दिवसांपासून नवी मुंबई आणि बेलापूर परिसरातील अनेक विभागध्यक्षांनी एकामागे एक असे राजीनामा सत्र सुरु केलं आणि त्याचा स्वतःच समाज माध्यमांवर खुलेआम प्रचार सुरु केला होता. पक्षाचं नैतृत्व करणाऱ्या राज ठाकरे यांचे चिरंजीव नवी मुंबईत मोर्चमधे सहभाग घेण्यासाठी येणार असल्याचं माहित असताना हे हेतुपुरस्कर केलं गेलं का असा स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. मनसेतील सदर राजकीय धुसपूस विकोपाला गेल्याच वृत्त महाराष्ट्रनामा न्यूजने मोर्चाच्या दिवशीच दिलं होतं. त्याचाच प्रत्यय आता प्रत्यक्ष आला आहे.

कारण मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या मनसेतील अंतर्गत संघर्षानंतर नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात गजानन काळे यांनी म्हटलंय की, सलग २-३ निवडणुका न लढताही नवी मुंबई विधानसभेत यंदाच्या निवडणुकीत ५० हजार लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखविला. मागील पाच वर्षात पक्षाची मजबूत बांधणी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र अमित ठाकरेंच्या मोर्च्याला यश येऊ नये त्याच्या एक दिवस अगोदर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला अन् राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष आणि नेते अभिजीत पानसे यांनी लक्ष घातल्यानंतरच गटातटाच्या राजकारणाला खतपाणी मिळाले असा थेट आरोप त्यांनी केला.

तसेच या संपूर्ण घटनेसाठी अविनाश जाधव यांनी मला दोषी ठरवले. दुसरी बाजू ऐकून घेण्याची तसदी नेते म्हणून घेतली नाही. या सगळ्या प्रकारामुळे मी व्यथित झालो असून अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात काम करणे अशक्य आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देतोय. मात्र महाराष्ट्रसैनिक म्हणून पक्षाचं काम करण्याचा माझा निर्णय आहे. आपल्या नेतृत्वावर कायम विश्वास व प्रेम केले. म्हणून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार मनात नाही. ते मी करणार नाही असा विश्वास गजानन काळे यांनी पक्षाला दिला आहे.

दरम्यान, नवी मुंबईसहित ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असताना मनसेत टोकाचे आरोप करत फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. सध्या नवी मुंबईत गणेश नाईक पुन्हा स्वगृही परतण्यासाठी चाचपणी करत आहेत आणि त्यात शिवसेना देखील नवी मुंबईत हातपाय पसरविण्याच्या जोरदार तयारीला लागली आहे. गजानन काळे यांनी मनसे अजून सोडली नसली तरी त्यांच्या केलेल्या आरोपांचा विचार करता, ते पक्षात राहतीलच याची खात्री देता येणार नाही. त्यात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे गजानन काळे या पक्षांच्या गळाला लागले तर संपूर्ण मनसे नवी मुंबईतून हद्दपार होईल आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतं देखील दुसऱ्या पक्षाकडे जातील अशी शक्यता आहे.

विशेष म्हणजे मध्यंतरी मनसेतील नेते मंडळींच्या पक्षातील (अपवादात्मक सोडल्यास) एकूण कार्यपद्धती आणि नेमकं पक्षाच्या प्रचारासाठी करतात काय यावर प्रश्न चिन्हं आणणारं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्याचाच प्रत्यय येऊ लागला आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे, ठाणे विधानसभा निवडणुकीत अविनाश जाधव यांना जरी ७० हजारांच्यावर मतं पडली असली तरी, त्यांनी स्वतःचा मूळ मतदारसंघ सोडून महेश कदम यांचा मतदारसंघ मिळवला होता आणि त्यासाठी देखील अभाजीत पानसे यांनी मध्यस्ती केली होती आणि मुळात त्याच मतदारसंघात महेश कदम यांची सामाजिक कामं आणि कार्यकर्त्यांची फळी होती. विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत मनसेचा सुपडा साफ झाला होता, मात्र ५ हजार मतांचा पल्ला गाठणारे आणि सर्वाधिक मतं मिळवणारे महेश कदम हे एकमेव उमेदवार होते. अविनाश जाधव यांनी मतदारसंघ बदलण्याचं मूळ कारण होतं, लोकसभेला शिवसेनेला पडलेली मतं आणि त्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंचा असलेला दबदबा म्हटलं गेलं. अखेर महेश कदम यांनाच ना इलाजास्तव स्वतःच्या ठाणे शहर मतदारसंघावर पाणी सोडून एकनाथ शिंदें विरुद्ध उभं राहण्याची वेळ आली. मात्र त्यानंतर महेश कदम पक्ष नैतृत्वाकडे पाहून व्यक्त झाले नसले तरी ते आतून दुखावले गेल्याचं वृत्त होतं. स्थानिक पातळीवर वरिष्ठ नेते मंडळींनी केलेली राजकारणं अनेकदा तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना समजून येत नाहीत आणि डॅशिंग पदाधिकाऱ्यांच्या फेसबुकवरील शेअरलाच सत्य समजून अनेकदा फसतात.

मात्र आता आधीच ठाणे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आणि त्यात एकनाथ शिंदे थेट राज्याचे गृहमंत्री आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेला मिळालेल्या मतांची खात्री अजिबात देता येणार नाही. त्यात तुलनेने नवी मुंबईत मोठी आंदोलनं करत गजानन काळे यांनी मेहनतीने पक्ष वाढवला आणि अविनाश जाधवांना जशी वरिष्ठ नेत्यांच्या लॉबीची नेहमीच साथ आणि प्रसिद्धी मिळाली ती गजानन काळेंना कधीही मिळाली नाही, मात्र तरी देखील त्यांनी स्वकर्तृत्वावर आणि कार्यकर्त्यांच्या साथीने नवी मुंबईमध्ये थेट महानगर महापालिकेच्या निवडणुकीत स्पर्धा निर्माण करण्याची स्थिती निर्माण केली आहे.

मात्र त्यातुलनेत ठाणे जिल्यातील पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अविनाश जाधव यांनी नैतृत्व करून देखील मनसेच्या उमेदवारांना केवळ ६ किंवा १० मतं पडली होती. त्यामुळे यावेळी ठाणे, पालघर, नवी-मुबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकी पैकी आमदार राजू पाटील यांच्या करिष्म्याने कल्याण-डोंबिवली निवडणुकीत मनसे चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. तर नवी मुंबईमध्ये देखील गजानन काळे यांच्या नैत्रुत्वात पालिका निवडणुकीत चांगली कामगिरी होण्याची शक्यता होती, मात्र ठाणे जिल्ह्यात पक्षासाठी आकड्यातुन निकाल देऊ शकणाऱ्या पदाधिकाऱ्याला आधीच असा निर्णय घेण्यास भाग पाडलं गेल्याच स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी बोलत आहेत. त्यामुळे मनसेत पक्ष विस्तारासाठी रस्त्यावर न दिसणारी ‘नेते गिरी’, अशावेळी मात्र अनेकदा पुढाकार घेताना आजही दिसत आहे, जे मनसेच्या हिताचं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या